‘प्रत्येक टप्प्यावर इंडिया आघाडी सत्तेच्या दिशेने’; अरविंद केजरीवाल यांचा दावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/श्रीरंग-बारणे-1-780x470.jpg)
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांचा अंदाज घेतल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार सत्तेच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे आणि ४ जून रोजी इंडिया आघाडी सत्तेत येणार आहे असा दावा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात इंडिया आघाडी सत्तेच्या अधिकाधिक जवळ पोहचत असल्याचे संकेत आहेत असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, इंडिया आघाडी देशाला स्थिर सरकार देईल. ते म्हणाले, प्रत्येक मतदानाच्या टप्प्यासह, हे स्पष्ट होत आहे की मोदी सरकार बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे आणि 4 जून रोजी आमच्या आघाडीची सत्ता येईल.
हेही वाचा – आरटीओचे मोठे पाऊल : विनानोंदणी वाहन दिसल्यास वितरक अडचणीत येणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी दिल्लीत झालेल्या त्यांच्या निवडणूक सभेत आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोपही केजरीवालांनी केला.
शहा यांच्यावर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, तुम्हाला पंतप्रधानांनी तुमचा वारसदार म्हणून निवडले आहे, त्यामुळे तुम्ही अहंकार दाखवत आहात. पण तुम्ही अजून पंतप्रधान झालेले नाहीत हे लक्षात घ्या असे ते शहा यांना उद्देशून म्हणाले.
तुम्ही म्हणालात की केजरीवाल यांना भारतात पाठिंबा नाही आणि पाकिस्तानात त्यांचे जास्त समर्थक आहेत. तुम्ही मला शिव्या देऊ शकता पण देशातील जनतेला शिव्याशाप देऊ नका. तुम्ही जनतेला शिव्याशाप दिल्यास ते कोणीही सहन करणार नाही, असे केजरीवाल पुढे म्हणाले.